Monday 30 June 2014

मंतरलेली संध्याकाळ

का कुणास ठाऊक , उन्हाशी पाठशिवणीचा खेळ खेळत संध्याकाळ उंबऱ्याशी येते
अन माझ्या जीवाला उगीचंच हुरहूर लागते ,
भीती असते का ती स्वप्नांच्या गावात हरवण्याची कि चांदण्यांच्या अंगणातल्या खेळात चंद्राने  डोकावण्याची ,
कसली हि मनाची घालमेल, उगीचच लागलेली रुखरुख , कसली तरी भयाण पोकळी जाणवते खोलवर,
अन त्या सूर्याला ढळताना बघत धडधडणार काळीज , तो उद्या उगवेल माहित असूनही गांगरून गेलेलं।  वेडं काळीज ...........
नकळत ओघळणारा अश्रुंचा थेंब , पापणी ओलावलेली  जाणवतही नाही , जाणवत जेव्हा ओलावलेल्या गालाला थंडगार झुळूक लगट करून जाते ,
अन नको होऊ दे संध्याकाळ असा वाटणारं वेडं मन ती संपायलाही नको असा हट्ट करू लागतं ,
उगाचचं त्या एकांताची सोबत अशीच राहावी वाटते , तेही भीतीनेच का सावली हि सोडून जाईल या विचारांनी?
कसलं हे मनाचं लाजीरवान वागणं सतत कुणाचीतरी अपेक्षा करणारं , जणू काही स्वताच अस्तित्वाचं नाही मूळी त्याला,
मग पुन्हा कुठतरी नवीन अपेक्षा, नवी चाहूल घ्यायची आस , खरे का खोटे पण पुन्हा तेच आभास ,
पावलांना तर आवरता येईल मनाला कसं आवरू , पावलं नाहीत भरकटणार पण मनाला कसं सावरू ,
पुन्हा सगळी प्रश्न कोडी सोडवूनही हि निरुत्तरित झालेलं मन कुठून सुरु अन कुठ संपतं त्याचा थांगपत्ताच नाही.

अन त्यातच झालेली रात्र , अंगणात  पडलेला चांदण्यांचा डाव

अन संपलेली ती मंतरलेली संध्याकाळ नेहमीसारखीच नुसतीच हुरुहूर लाऊन गेलेली उद्या पुन्हा येण्यासाठी 




सोनाली गाढवे देशमुख. दि. ३० जून  २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.




Thursday 26 June 2014

चांदण्याचं गाव

काही प्रसंग खूपच वेगळे असतात , दुखं मनाला इतकं हेलावून टाकत आणि त्या क्षणी नेमकी जवळची वाटणारी माणसं हि परकी वाटू लागतात मग कुठंतरी  कधीच नसलेलं नातं जन्म घेतं , न पाहिलेलं , न भेटलेलं आणि त्या दुखात साथ देत केवळ शब्दांनी ,दिसत नसलं तरी त्याचे भाव एकू येतात आणि नकळत बंध जुळू लागतात. 
अंतर्मुख होत मन त्या नात्यात कुठलाच आडपडदा राहत नाही . दुख अजूनही सोबत असतच पण त्याची तीव्रता कमी भासू लागते कोणाच्यातरी अनपेक्षित येण्याने , कुणाच्यातरी फुंकर घालण्यानेजग परक वाटत असताना कुणीतरी आपली विचारपूस करणार आहे या भावनेने . मग मनाला गरुडपंख लाभतात सारं आकाश सामावण्यासाठी , त्या दुखातून  उभारता उभारता काही स्वप्न पहिली जातात , फुलविली जातात आणि ती सत्यात उतरवण्यासाठी धडपड सुरु होते , अन त्या धडपडण्यातही आनंद गवसतो ,  माणसाचं मन खरच शेवाळासारखं सतत ओलावा शोधणारं , जुनाट पडक्या भिंतीवरही पावसाच्या काही सरींनी तिथंहि ते फुलतच. आणि मग शीतल चांदण्याचा शोध घेतला जातो एकमेकांच्या साथीने कितीतरी उन्हाळे एकत्र झेलण्याची दोन्ही मनांची तयारी असते. सुवर्ण भविष्यकाळाची स्वप्न तर पाहायला सुरुवात केलेली असते , पण खरच सुखासुखी ती सत्यात उतरतील का , अन ते चांदण्याचं गाव खरंच कधी सापडेल का?


सोनाली गाढवे देशमुख. दि. २६ जून  २०१४. 

© सोनाली गाढवे देशमुख.